Atmanirbhar Bharat Essay in Marathi language | आत्मनिर्भर भारत निबंध

Atmanirbhar Bharat Essay in Marathi language – 21 वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. जगभरात तंत्रज्ञानामुळे अगणित प्रगती झाली आहे. अनेक देशांनी प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे. अर्थात आपला भारत देश सुद्धा प्रगाती पथावर वाटचाल करत आहे. आता भारताचा उल्लेख ‘विकसनशील देश’ म्हणून होणार नाही असे विश्व बँकेनं घोषित केले आहे. परंतु सद्यस्तिथीत आपला भारत देश हा अजूनही पूर्णपणे विकसित देश झालेला नाही. त्यामुळे आत्मनिर्भर भारत ही काळाची गरज आहे असं नाही का वाटत ?

नक्की वाचा – माझा देश भारत मराठी निबंध

आपणा सर्वांना माहितच आहे की कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. ही परिस्थिती भयावह असली तरी यातून आपण संधी शोधून काढू शकतो. प्रत्येक व्यक्ती या समस्येतून स्वतः बाहेर पडू शकतो. स्वतःजवळ असलेल्या कलेतून आणि कौशल्यातून रोजगार निर्मिती करून प्रत्येक भारतीय स्वतः एक जबाबदार व्यक्ती तर बनुच शकतो शिवाय देशही प्रगतीपथावर नेऊ शकतो. संपूर्ण देशात उद्योग चळवळ उभी करून देशाची आर्थिक संपन्नता आपण वाढवू शकतो.

देशातील लघु उद्योग, मध्यम उद्योग यांना चालना देण्यासाठी नरेंद्र मोदींनी हे पॅकेज देशासमोर सादर केले आहे. तसेच शेती, शिक्षण आणि अन्य मोठे उद्योग यांनाही चालना मिळू शकेल अशीही उपाययोजना या अभियानात आहे. कोरोना संसर्गात सर्वात जास्त फटका बसला ते म्हणजे शेतकरी, मजूर, आणि कामगार! या सर्व घटकांना पुन्हा एकदा उभारी देण्याचे काम हे अभियान नक्कीच करेल.

‘उद्धरावा स्वये आत्मा!’ ही सनातन भारतीय दृष्टी आहे. आपल्या उद्धारासाठी आणखी कोणीतरी कोठून तरी येतील ही, ‘असेल माझा हरी…’पद्धतीची विचारसरणी नाकारून, ज्याचा तोच किंवा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही शिकवण आपल्या देशात अनेकांनी जनमानसात रुजविण्याचे प्रयत्न केले आहेत. आत्मनिर्भर भारताची हाक ही त्याच परंपरेतले पुढचे पाऊल आहे. सुरुवातीच्या काळात भारत परावलंबी होता. भारतात लागणाऱ्या दैनंदिन गरजेसाठी बाहेरच्या देशांतून वस्तूंची आयात करावी लागत असे.

भारताचे आर्थिक उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत फार कमी होते. वर्गीकरण हे व्यक्तीचे उत्पन्न, जीडीपी, राहणीमान, शिक्षणाची पातळी, आयुर्मान इ. वर केले जाते. त्यामुळे भारत देशाचे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर ‘लो इन्कम देश’ किंवा अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात आले होते. परंतु आता आपल्या भारत देशाचा दर्जा बदलला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर विकसनशील देशांपेक्षा चांगली आहे, परंतु ज्या देशांचे अद्याप विकसित देश असल्याचे संकेत दिसत नाही, त्यांना नवीन औद्योगिक देशांच्या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारताला ‘लोअर मीडल इन्कम’ असणाऱ्या देशांसोबत सामील करण्यात आले आहे.

अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपण पूर्वीच आत्मनिर्भर झालो आहोत, पण ऊर्जा, पाणी, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान, औषधनिर्माण अशा अनेक क्षेत्रांत आपण आणखी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी स-कुशल मनुष्यबळ निर्माण करावे लागेल. महाराष्ट्रात केळी, द्राक्षे, संत्री, आंब, स्ट्रॉबेरी अशी फळफळावळे मोठ्या प्रमाणात होतात, पण फळ प्रक्रियांची मोठी केंद्रे तयार झाली, तर शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू शकेल. कापूस, भात अशा पिकांच्या बाबतीतही हेच आहे.

अन्न प्रक्रिया, सेंद्रिय शेती, लोह, ऍल्युमिनियम व तांबे, कृषि-रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री, फर्निचर, चर्मोद्योग व विशेषतः पादत्राणे, ऑटोमोबाइल पार्ट्स, वस्त्रोद्योग व मुखावरणे, सॅनिटायझेन आणि वेंटिलेटर्स या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करायला हवी. उद्या चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आकर्षून घ्यायचे असेल, तर तशा सोयी-सुविधा व तशीच धोरणेही असावी लागतील.

भारताचे पंतप्रधान माननीय मोदी असे म्हणाले की, आपल्याला आनंद आणि समाधान देण्याबरोबर आत्मनिर्भरता आपल्याला सामर्थ्य देखील देते. 21 व्या शतकाचे भारताचे शतक बनविण्याची आपली जबाबदारी केवळ स्वावलंबी भारताच्या संकल्पातूनच पूर्ण होईल. या जबाबदारीमुळे केवळ 130 करोड कोटी देशवासीयांच्या जीवनशक्तीतून ऊर्जा मिळेल.

Aatmnirbhar Bharat essay in Marathi language. आत्मनिर्भर भारत हा निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!