सागराचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Sea Essay in Marathi

Autobiography of Sea Essay in Marathi: मी आहे सागर. माझे अथांग स्वरूप पाहून तुम्ही सारे हरखून जाता. जगातील अनेक कवींनी आपल्या काव्यात मला स्थान दिले आहे. ‘किनारा तुला पामराला!’ असे अधिक्षेपाने कवी कुसुमाग्रजांनी मला सुनावले. ‘सागरा प्राण तळमळला’ असे विनवत कवी सावरकरांनी मातृभूमीला नेण्यासाठी माझी आळवणी केली. हे वसुधापुत्रांनो, मी कुणी परका का आहे? मी तर धरित्रीचा सहोदर. धरित्री आणि मी बरोबरच अवतरलो. मग मी तुमचा मामा नाही का? मी सदैव तुमचाच विचार करतो. तुमच्या हिताची काळजी वाहतो. तुमच्या यशाने उचंबळून येतो. उंच लाटांच्या रूपात तुमच्याकडे झेपावत असतो.

सागराचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Sea Essay in Marathi

सागराचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Sea Essay in Marathi

माझ्या अथांगतेचा तुम्ही उल्लेख करता. माझे मन केवढे विशाल आहे, याची तुम्हांला कल्पना आहेच. तुमचे सर्व गुण-दोष व चांगले-वाईट सारे मी स्वीकारतो; कारण तुम्ही माझेच आहात. डोंगरावरून वाहणाऱ्या नदया धरतीला चैतन्य बहाल करून अखेरीस माझ्यात समर्पित होतात. सरितांचे गोड पाणी मी खारट करतो असा माझ्यावर आरोप केला जातो; पण हे माझे पाणी खारट का होते, याचा कोणी कधी विचार करतो का? आणि वेड्यांनो, हे पाणी खारट झाले नसते तर तुमचे जीवन अळणीच राहिले असते. मीठ निर्माण करण्याची क्षमता या माझ्या खारट पाण्यातच आहे. महात्मा बापूजी साबरमतीहून माझ्या तीरावर मीठ उचलायला आले ना तेव्हा मला धन्य वाटले होते ! महात्माजींनी उचललेल्या त्या चिमूटभर मिठाने त्या वेळी केवढी क्रांती केली होती!

‘मित्रांनो, तुमच्या जेवणाची लज्जत मी वाढवतो ती माझ्यातील जलचर संपत्तीमुळे! वेगवेगळ्या चवींचे मासे तुमच्यातील काहीजण मोठ्या आवडीने खातात. माझ्या पोटात  तऱ्हेतऱ्हेची रत्ने आहेत, म्हणून तर तुम्ही मला ‘रत्नाकर’ या नावाने देखील संबोधता

हे विज्ञानयुगातील मानवा, आज तुझ्या जीवनाला विलक्षण गती आली आहे. या गतीला इंधन हवे असते. ते इंधनही मी मिळवून देतो. केवळ तुमचेच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनच माझ्यावर अवलंबून आहे. माझ्या पाण्याची वाफ होते तेव्हाच तुम्हांला पाऊस मिळतो. ते पाणी म्हणजेच तुमचे जीवन ! माझ्या त्सुनामी लाटांनी काहीजण माझ्यावर रागावले; मला दूषणे देऊ लागले. पण त्यांत माझा काय दोष? धरणीच्या उदरातील कंपनांचा तो परिणाम होता.

“दोस्तांनो, जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरोखर जगला. आज माझ्या मदतीने तुम्ही दूरवरच्या खंडातून फिरू शकता तेव्हा बरे वाटते. नव्या खंडाचा शोधही मी तुम्हांला लावूनदिला. भारतमातेच्या तर तीनही बाजूंना माझेच अस्तित्व आहे. तेव्हा मला तुमचा सहवास दया, त्यात माझी कृतार्थता आहे. एवढेच माझे सांगणे आहे.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Leave a Comment