राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी निबंध Tukdoji Maharaj Essay in Marathi

Tukdoji Maharaj Essay in Marathi: ‘प्रयत्ने मानव होई उन्नत। गावचि नव्हे, हालवी दिक्प्रांत ।’ असा प्रयत्नाचा महिमा वर्णन करणारे संत तुकडोजी महाराज हे विदर्भातील यावली गावचे सुपुत्र. त्यांचा जन्म १९०९ मध्ये झाला. त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने त्यांच्या घरात विठ्ठलभक्ती, ज्ञानेश्वर-तुकाराम भक्तीदेखील रुजली होती. तुकडोजींचे नाव माणिक बंडोजी ठाकूर या माणिकने तिसरीतच शाळा सोडून दिली आणि तो ध्यान, भजन-पूजन यांत रंगून गेला. तो नेहमी तुकोबाचे अभंग म्हणत असे. एकदा हा माणिक आपल्या आजोळी गेला असताना, त्याचे गुरू आडकुजी महाराज त्याला म्हणाले, “। तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा.” तेव्हापासून गुरुजींच्या आज्ञेनुसार माणिक ‘तुकड्या म्हणे’ या नाम-पदाने संपणारे अभंग रचू लागला. लोक त्याला ‘तुकडोजी महाराज’ म्हणून ओळखू लागले.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी निबंध Tukdoji Maharaj Essay in Marathi

पुढे तुकडोजी महाराजांनी विपुल रचना केली. त्यांची चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले ‘ग्रामगीता’ हे काव्य त्यांनी रचले. ते हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना करत. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इत्यादी विषयांवर ते कीर्तने करत गावोगाव हिंडत. आपल्या कीर्तनात ते स्वरचित गीते खंजिरीच्या साथीवर म्हणत असत. लोकांनी त्यांना ‘ राष्ट्रसंत’ म्हणून गौरवले.

आपले कीर्तन, आपली खंजिरी यांचा उपयोग तुकडोजी महाराजांनी समाजसेवेसाठी केला. समाजात परंपरेने आलेल्या अनिष्ट रूढी, जाति-धर्म-पंथभेद, अंधश्रद्धा या गोष्टींवर संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने घणाघाती हल्ला केला. ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांपुढे ठेवले. त्यामुळे सर्व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी झाले. लौकिक जीवन चांगल्या त-हेने जगावे, असे त्यांचे सांगणे असे. म्हणून आपल्या कीर्तनातून ते व्यायामाचा प्रचार करत.

१९३० साली तुकडोजी महाराजांचा महात्मा गांधीजींशी संपर्क आला आणि त्यांनी राष्ट्रकार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वत:ला भूदान, जातिनिर्मूलन इत्यादी कामांना वाहून घेतले. विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी ते जपानलाही गेले होते. समाजात धार्मिक एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांनी आटोकाट यत्न केले. १९६८ साली संत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. आजही त्यांच्या गुरुकुंज आश्रमातून समाजोपयोगी कार्याची परंपरा अखंडपणे चालू आहे.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!