वादळग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Wind Storm Victim Essay in Marathi

Autobiography of Wind Storm Victim Essay in Marathi: सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो. रात्री गप्पा मारता मारता वादळाचा विषय निघाला. पाच वर्षांपूर्वी गावाला बसलेल्या वादळाच्या तडाख्याविषयी मामा सांगू लागला, “जूनचा पहिला आठवडा उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. रोज पावसाळी हवा वाहत होती; पण थेंब काही टपकत नव्हते. एक दिवस अचानक वारा सुटला अन् ग्रीष्माच्या तडाख्याने ग्रासलेल्या सर्वांना हायसे वाटले. हे सुख आम्ही फार काळ उपभोगू शकलो नाही. कारण ते नेहमीचे वारे नव्हते.

क्षणाक्षणाला वाऱ्याचा वेग वाढत होता. त्याच्या वाहण्याला निश्चित दिशा नव्हती. अंगात आल्यासारखा वारा घुमत होता. तेव्हा मात्र आम्ही धसकलो. मिनिटागणिक वाऱ्याचा जोर वाढत होता. तेव्हा मात्र लक्षात आले की, हे साधे वारे नाहीत, हे वादळ आहे. तब्बल चार तास वायचा धुमाकूळ चालू होता. वाऱ्याचा सोऽ सोऽ आवाज चारही बाजूंनी घुमत होता. घराबाहेर पडणे अशक्य होते. रस्ते निर्मनुष्य झाले होते. जीव मुठीत धरून माणसे कुठे ना कुठे तरी आश्रयाला गेली होती. घरात असलेली माणसे बाहेर गेलेल्यांची काळजी करत होती.

 

वादळग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Wind Storm Victim Essay in Marathi

रात्र संपली आणि वादळही शमले. झुंजुमुंजू झाल्यावर माणसे घाबरत घाबरत बाहेर पडू लागली. प्रचंड पडझड झाली होती. माझ्या बागेतील निम्यापेक्षा जास्त झाडे जमीनदोस्त झाली होती. मोठ्या हौसेने लावलेली कलमे उन्मळून पडली होती. महिनोन्महिन्यांचे कष्टमातीमोल झाले होते. पण गावात झालेली इतर पडझड पाहून मी माझे दुःख विसरलो. कित्येक लोकांची घरे पडली होती. घरांवरचे पत्रे उडून काहीजण जखमी झाले होते. नशिबाचा भाग म्हणजे कुणी दगावले नव्हते. काही गुरे मात्र मृत्युमुखी पडली होती. संपूर्ण गावाचे अतोनात नुकसान झाले होते.

जिल्हाधिकारी गावात येऊन पोहोचण्यासच चार दिवस गेले. वादळग्रस्तांना मदतीचा विचार करण्यासाठी कमिट्या नेमल्या गेल्या, योजना आखल्या गेल्या, आश्वासने दिली गेली; पण प्रत्यक्ष मदत गरजवंतांपर्यंत पोहोचलीच नाही. सहा-आठ महिन्यांनी कधी मदत आली तेव्हा ती ग्रामपंचायतीच्या मंडळींनी स्वत:तच वाटून घेतली. त्यांच्या घरांवर नवीन कौले चढली! मात्र खरे गरजवंत उघड्यावर पडले.

गावकऱ्यांची दुःखे गावकऱ्यांनीच जाणली. वादळामुळे घराचा आसरा हरपलेल्यांना प्रथम देवळात, धर्मशाळेत ठेवण्यात आले. पहिले काही दिवस तर सामुदायिक भोजनाचीच व्यवस्था करण्यात आली. मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन ‘सेवा मंडळ’ काढले. पैसा उभा केला. ज्यांना पैसा देणे शक्य नव्हते त्यांनी वस्तू दिल्या. गावातून बाहेर चाकरीला परदेशात वा स्वदेशात इतरत्र गेलेल्यांना गावाची अवकळा कळली, तेव्हा त्यांच्याकडून भरघोस मदत आली. सेवा मंडळाच्या मदतीने गाव पूर्ववत उभे करण्यात आले. सारे गाव कामाला लागले. पण पडलेली झाडे, कलमे उभी राहण्यास काही काळ जावा लागणार आहे. मात्र याच काळात गावाचे खरे हितचिंतक कोण, याची कसोटी लागली.

“कधी कधी मनात येते… माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेचा कितीही गर्व केला तरी शेवटी त्याला निसर्गापुढे नमतेच घ्यावे लागते. निसर्ग अत्यंत लहरी आहे. माणसाच्या गर्वाचा फुगा तो फोडतो आणि त्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतो.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!