एका वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Warkari Essay in Marathi

Autobiography of Warkari Essay in Marathi: मी एक वारकरी आहे. नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी वारी कधी चुकवत नाही. ही वारी, ही तुळशीची माळ मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. जर शेतीवाडी मला वंशपरंपरेने मिळत असेल; तर वडिलांची भक्ती, निष्ठा ही पण वंशपरंपरेने का मिळू नये? पण एक गोष्ट नक्की – ही भक्ती काही मी आंधळेपणाने स्वीकारलेली नाही.

 

एका वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Warkari Essay in Marathi

मी शेतकरी आहे, मला शेती करायला आवडते. मी सुशिक्षित आहे, पदवीधर आहे. तरी पण वारीला जायलाही मला आवडते. वारी हे सर्व वैष्णवांचे विदयापीठ आहे. या विदयापीठात आम्हांला मिळणारे टॉनिक, जीवनसत्त्व हे आम्हांला वर्षभरासाठी पुरते. किंबहुना वर्षभरात येणाऱ्या विविध अडचणींवर आम्ही याच जीवनसत्त्वांमुळे मात करतो.

वारी हे महाराष्ट्राचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी लाखो भक्त आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. या दिंडीत सर्व जाती-धर्मांचे लोक असतात. सर्व वयाचे- अगदी वृद्धांपासून युवकापर्यंत – सर्वजण वीस-एकवीस दिवस बरोबर असतात. सर्व गैरसोय सहन करतात. कारण त्यांना ती गैरसोय वाटतच नाही. त्यांची जात, त्यांचा धर्म एकच असतो. ते सर्वजण त्या एकाच पंढरीची लेकरे असतात. विठाई माऊलीबरोबर ते ग्यानबा तुकोबांचे सखे असतात. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संतांचे अभंग गुणगुणत वारीत चालतात. त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत. नाचत, गात, कीर्तन करत आणि वेगवेगळे खेळ खेळत हे लाखो वारकरी जेव्हा एवढी वाट तुडवतात, तेव्हा ते केवळ भक्तिरूपच झालेले असतात. त्यामुळे या वारीच्या काळात आलेल्या अडचणी, आजारपण या सगळ्यांवर ते मात करू शकतात.

लाखो लोक एवढे एकदिलाने कसे एकत्र राहू शकतात, याचेच देशी-परदेशी लोकांना नवल वाटते. अनेक विद्वान, अभ्यासू लोकही या वारीत असतात. समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे या स्वत: वारीबरोबर आल्या होत्या. त्यांनी, विठ्ठलाचा उल्लेख ‘माय बॉयफ्रेंड’ असा केला होता. सर्वच वारकऱ्यांना विठोबा हा आपला ‘सखा’ वाटतो आणि या सख्याला भेटायला जाताना ते आपले ‘तनमनश्रम’ सर्व विठ्ठलाच्या पायाशी अर्पण करून विठ्ठलमय झालेले असतात.

मित्रांनो, वारकरी आणि त्यांची दिंडी ही खरी भक्तीची पेठ आहे. मृग नक्षत्रावर शेताची पेरणी करून तो वारीला जातो आणि पंढरपूरच्या देवळाचा कळस पाहून तो मिळेल त्या वाहनाने परत फिरतो. कारण त्याचे शेत, शेतातील कामे त्याची वाट पाहत असतात. आल्या आल्या दुप्पट जोमाने तो कामाला लागतो. कोणत्याही इतर फळाची त्याला अपेक्षा नसते. कारण वारीचे फळ त्याला मिळालेले असते.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!