मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध Autobiography of Tree Essay in Marathi

Autobiography of Tree Essay in Marathi: माझ्या गावात एक मोठा कारखाना उभारण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजवळ आले आणि … आणि काय नवल! त्या वृक्षाने गर्जना केली-“दूर व्हा कृतघ्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो!” क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला-

मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध Autobiography of Tree Essay in Marathi

मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध Autobiography of Tree Essay in Marathi

अरे मुर्खानो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या उतारवयातही मी काटक आहे, मजबूत आहे. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही.

मित्रांनो, मी केवळ एक जुना वठलेला वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाचा जन्म, या गावाचा विकास, या गावाचे आजचे समृद्ध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहायला आली. पण तेव्हादेखील त्यांनी प्रथम माझे पूजन करून नंतरच गावात प्रवेश केला. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत. ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली.

मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांना माझ्या शीतल सावलीत आसरा दिला. अनेक पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांदयांवर खेळत असतात आणि रात्री माझ्याच फांदयांवर विसावतात. गावातील सारी मुले सूरपारंब्या खेळण्यासाठी येथेच जमतात. कित्येक सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात. अशा रीतीने माझा हा सारा आसमंत म्हणजे गावाचे एक तीर्थक्षेत्र बनला आहे.

या गावकऱ्यांविषयी मला विलक्षण जिव्हाळा वाटतो. म्हणून उंच उंच गेलेल्या आणि पसरलेल्या माझ्या फांदयांनी मी वरुणराजाला सदैव कळकळीचे आवाहन करत असतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे सावट कधीच भेडसावत नाही. लोकहो, तुम्ही गावाला नवे रूप देताना येथील जुन्या वृक्षांची कत्तल करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.” इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि काय चमत्कार ! वृक्षतोडीसाठी जमलेले सारे लोक दूर झाले, ते अधिक झाडे लावण्याच्या निर्धारानेच !

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!