मी रेडिओ बोलतोय मराठी निबंध Autobiography of Radio Essay in Marathi

Autobiography of Radio Essay in Marathi: अरे, तुमचे ते दूरचित्रवाणीचे खोके थोडा वेळ बंद करा आणि माझे म्हणणे ऐका. मी रेडिओ बोलतोय. आजकाल तुमच्यापैकी बऱ्याचजणांना माझा विसर पडला आहे. कारण ‘गरज सरो आणि वैदय मरो !’ हीच बऱ्याच जणांची प्रवृत्ती असते. पण एक काळ असा होता की, त्यावेळी तुमची आणि माझी अगदी घनिष्ठ मैत्री होती. त्यावेळचे कलावंत, गायक आपल्या नावापुढे मोठ्या कौतुकाने ‘रेडिओस्टार’ असे बिरूद लावत. माझा आवाज लहरींच्या रूपाने अवकाशातून, हवेतून तुमच्यापर्यंत येतो. म्हणून मला ‘आकाशवाणी’, ‘नभोवाणी’ अशा नावांनी संबोधले जाते.

 

मी रेडिओ बोलतोय मराठी निबंध Autobiography of Radio Essay in Marathi

माझा जन्म हा मनोरंजनासाठी झाला असला, तरी समाज प्रबोधन हे माझे उद्दिष्ट आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय !’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे तेव्हाही आणि आजही माझ्यावरील कोणताही कार्यक्रम आयोजित करताना समाज-शिक्षण हे त्यामागे मुख्य प्रयोजन असते !

अरे छोट्या दोस्ता, तुला ठाऊक आहे का? तुमच्या स्वातंत्र्यलढ्यात मी केवढी मोठी कामगिरी केली आहे. जरी त्यावेळी येथे भारतात इंग्रजांचे राज्य होते, तरी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपली गुप्त नभोवाणी केंद्रे चालू केली होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तू वाचलास तर तुला आढळेल, १९४२ सालच्या ‘चले जाव’च्या लढ्याच्या वेळी अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते आणि त्यांनी स्वत:चे नभोवाणी केंद्र चालवले होते. ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानच्या बाहेर गेले होते. तेव्हा सिंगापूर केंद्राला कान लावून भारतीय जनता नेताजींचे ‘चलो दिल्ली ‘चे संदेश ऐकत असे.

आज शहरातील माझे महत्त्व थोडे कमी झाले असले, तरी खेडोपाडी अजूनही माझ्यावर प्रेम करणारे अनेक श्रोते आहेत. शेतात राबणारे शेतकरी, मशिनवर कपडे शिवणारा शिंपी, इतकेच काय संध्याकाळी गावकरी चावडीवर जमतात तेव्हाही ते मला ऐकतात. शेतीविषयक कार्यक्रमाबरोबर, सगळ्या जगाच्या बातम्या, भजन, कीर्तन, विविध सामाजिक समस्यांवरील मालिका, चित्रपट, विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम ऐकून ते ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही साधतात. विश्व क्रिकेट सामन्यांचा वृत्तान्तही ते माझ्याकडूनच समजून घेतात. आज अगदी दूरवरच्या खेडेगावातून, आदिवासी पाड्यांतून, अगदी मागासलेल्या वस्तीतूनही बालकांच्या संगोपनाविषयी, आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी जी काही थोडीफार जागृती होत आहे, त्याचे श्रेय माझ्याकडेच जाते.

“आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो लक्षात ठेव. मी हे सर्व काम करताना सर्व बंधने पाळतो. इतर माध्यमांप्रमाणे कोठेही अतिरेक वा खोटेपणा येऊ देत नाही. कारण माझे माझ्या श्रोत्यांवर प्रेम आहे. मी त्यांचा खरा हितचिंतक आहे.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!